भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात   

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारताचा महिला आंतर राष्ट्रीय कृषी हॅकेथॉन रविवार १ जून ते मंगळवार ३ जून २०२५ या कालावधीत पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘हॅकेथॉन’चे उद्घाटन तर समारोप केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी गुरूवारी पत्रकारांना दिली. या प्रवेशासाठी १५०० जणांनी नोंदणी केली आहे.
 
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन हा कृषी क्षेत्रातील नवप्रवर्तन संवाद आणि सहकार्याला चालना देणारा देशातील सर्वात मोठा मंच ठरणार आहे. देशभरातील तरूण तंत्रज्ञ, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील नेते, शासकीय अधिकारी एकत्र येवून भारतीय कृषी क्षेत्रातील प्रमुख समस्यांवर वेगवान प्रभावी व खर्चिक दृष्ट्या योग्य उपाय शोधतील आतापर्यंत उपक्रमामध्ये १८०० जणांनी सहभाग नोंदवला आहे. त्यातून ५६० जणांनी त्यात आपले सादरीकरण केले आहे. त्यातून १४० जणांची निवड झाली आहे. ते प्रत्यक्षात १ ते ३ जूनच्या प्रदर्शनात सहभागी होऊन प्रेझेंटेशन देणार आहेत. त्यातून अंतिम १६ जणांची पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी निवड केली जाणार आहे.
 
हा हॅकेथॉन केवळ स्पर्धा नसून स्मार्ट, शाश्वत व तंत्रज्ञानधिष्ठीत शेतीकडे वाटचाल करणारी एक चळवळ आहे. असे सहभागी विद्यार्थ्यांना स्टार्टअप्सना व तज्ज्ञ व्यावसायिकांना विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील ८ विजेत्यांना रूपये २५ लाख, ८ उपविजेत्यांना रूपये १५ लाखाची पारितोषिके दिली जाणार आहेत.
 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठीत संस्थांच्या सहकार्याने ‘हॅकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. यामधील आंतरराष्ट्रीय भागीदार इस्त्रायल, नेदरलँड्स दूतावासातील कृषी विभाग हे आहेत. तर राष्ट्रीय भागीदार म्हणून बॉम्बें चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरल, कृषी सहकार विभाग बँक ऑफ महाराष्ट्र, आयएमएटी, माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे, मायक्रोसॉफ्ट डिपेक्स, महाराष्ट्र इनोवेशन सोसयटी, किसान यांचा सहभाग आहे.कृषी समस्येवर तांत्रिक उपाय त्याचबरोबर मृदव्यवस्थापन, उत्पादनात वाढ, पाणी टंचाई अशा समस्यांवर स्मार्ट आणि शाश्वत उपाय सूचवले जातात.

Related Articles